Friday 15 July 2011

राम नदी काठच्या भुताची व्यथा

Original Post Date - 26 Jan 2011

आज १०-१२ वर्षे झालीत मला इथे राम नदीच्या काठी गुण्या गोविंदाने राहायला.. पण परवा ३ डिसेंबर ला माझी पुरती झोप उडाली..
जवळच एका मोठ्या साहेबांचा बंगला आहे.. बंगला कसला, महालच म्हणा कि.. साहेबांच्या मुलाची सोयरिक दिल्ली च्या मुलीशी आणि मुलीचे लग्न म्हणे एका माजी क्रिकेट पटूच्या मुलाशी जमले (कि झाले?).. असे परवा एक पत्रकार भूत सांगत होता.
असो.. आम्हाला काय त्याचे सोय-सुतक?
 पण.. ३ डिसेंबर ला कसला तरी (कदाचित आपल्या व्याह्यांना खुश करण्यासाठी)  कार्यक्रम साहेबांच्या घरी होता.. आता साहेबांचे तसे कौतुक आहेच मला.. एकतर मराठी असून धंदा करतात.. शिवाय हेलीकॉप्टर्स पण आहेत त्याच्या कडे.. (त्यांचे हेलीकॉप्टर कमळवाले, धनुष्य-बाणवाले सुद्धा सर्रास वापरतात म्हणे.. सह्याद्रीचे फोटो काढण्यासाठीच हो..)
संध्याकाळी ७ वाजता सुरु झालेला कार्यक्रम छान पैकी हेड-फोन लावावेत इतका छान कानावर पडत होता.. हळू हळू तो आदळू लागला.. पण असते एकेकाला हौस म्हणून सगळे गप्पा बसले.. डेसिबल कि काय म्हणे सगळे धाब्यावर!!

रात्र झाली.. सभ्य माणसाच्या भूतासारखे आम्ही झोपायचा प्रयत्न करू लागलो.. पण तो (कर्कश्य) आवाज काही झोपू देईना..

साडे अकरा वाजले .. मग मी १०० नंबर वर फोन केला.. शंबर नंबर वाले पण एक नंबर आहेत... म्हणाले हो का? असा का? कुठे? मघाशी तुम्हीच फोन केलात ना?” मी म्हटले अहो नाही.. आताच फोन करतोय.. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे रात्री १० नंतर .. वगैरे वगैरे..
आमचा शिपाई गेला आहे.. होईल बंद इतक्यात..

साडे बारा वाजता पुन्हा फोन केला.. पुन्हा तेच.. हो का? अजून बंद नाही झाला? आमचा शिपाई गेला आहे.. होईल बंद इतक्यात..
एक वाजून १० मिनिटे .. हो का? अजून बंद नाही झाला? ... तुम्ही.. अच्छा तुम्ही भूताजी बोलताय ना? राम नदी च्या काठी राहता? बरोबर?”
मी वैतागून.. "साहेब, तुमच्या पुढे कॉम्प्युटर आहे आणि तुम्हाला कॉलर आयडी वरून सगळे काळात असेल हे माहीत आहे मला.. "
..नाही, तसे नाही.. आम्ही २-३ वेळा माणूस पाठवला आम्ही तरी अजून काय करणार?
थोडक्यात, माझा नाव पत्ता सांगून साहेबांनी माझा पत्ता कट केला.. तुम्ही पुन्हा फोन केलात तर तुमचे नाव,नंबर बंगल्या वाल्या साहेबांपर्यंत पोचेल..अशी गोड धमकी मला मिळाली होती..

शेवटी, रात्री २ वाजून २० मिनिटांनी बंगल्या वाल्या साहेबांना आमची दया (भूतदया) आली!!  मुन्नी बदनाम हुवी "क्ष क्ष" तेरे लिये.. अशी आरोळी माईक वरून झाली.... दुसर्या दिवशी पेपर मधून काही बातमी आली असेल.. पण काही नाही.. साहेबांनी सत्ताधारी आणि विरोधी दोन्हींना खिशात ठेवले असल्याने कोणी चकार काढला नाही..
हेच जर का माझ्या सारख्या सामान्य भुताने केले असते tar.. ४-५ सायरन वाल्या गाड्या आल्या असत्या आणि मी तुरुंगात बसलो असतो.
शेवटी, बळी तो कान पिळी!!

No comments:

Post a Comment